RSS

बोधप्रद कथा

बोधप्रद कथा
परीस
     एक माणूस परीस(पारस) शोधायला निघाला. त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला. दिवस गेले. महिने लोटले. वर्षे सरली. पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही .तो दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा. शेवटी तो माणूस म्हातारा झाला. आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता. त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले. ती साखळी सोन्याची झाली होती. दगड घ्यायचा, साखळीला लावायचा व फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही.
तात्पर्य:
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो. कधी आई- वडिलांच्या रूपाने, कधी भाऊ-बहीनीच्या नात्याने, कधी मित्र-मैत्रिणीच्या नात्याने, तर कधी प्रेयसीच्या नात्याने. कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो. आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो.
*********************************************************************
जिद्द
प्राचीनकाळी आश्रमात शिक्षण दिले जाई. शिष्यांना गुरुजीची सेवा करावी लागे, वेळ्प्रसंगी गुरुजी शिष्यांना शिक्षा करीत.असेच एकदा शिष्यांनी योग्य पाठांतर केले नाही म्हणून गुरुजी त्यांना छ्ड्या मारीत होते.शिष्य छ्ड्या खाऊन मुकाट्याने खाली बसत.एवढ्यात एका शिष्यांने हात वर केला.गुरुजी चमकले व म्हणाले “अरे तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही, तुला मारुन काय उपयोग.” शिष्याला मोठा अपमान वाटला.त्याने मनोमन ठरविले “मी माझ्या हातावर विद्येची रेषा खेचून आणेल.”त्याने अपार कष्ट घेऊन विद्या सपांदन केली.एवढेच नव्हे तर तो एक महानव्याकरणकार झाला.तो म्हणजेच संस्कृतचा महान व्याकरणकार ‘पाणिनी’ !
तात्पर्य :-
ज्ञान मिळवण्यासाठी स्वत: चिंतन, मनन, अभ्यास व अपार कष्ट् करावे लागतात.
Self Study is Supreme Study.
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ                             
एक शेतकरी आपल्या शेतात मध तयार करीत असे. एकदा एका अस्वल कुंपण तोडून शेतात आले व पोळ्यातील मधा खाऊ लागले.त्याचबरोबर पोळ्यातील मधमाश्यांनी एकदम हल्ला चढविला पण अस्वलाची कातडी जाड असल्याने मधमाश्याचे काही चालले नाही. नंतर मधमाश्यांनी युक्ती लढवून त्याच्या नाकावर आणि डोळ्यावर हल्ला केला, त्यामुळे अस्वलाला खाज सुटली त्रासून तो आपले नाक व डोळे ओरबाडू लागला.आणि त्याचेच नखांनी तो रक्तबंबाळ झाला.
तात्पर्य :- शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.
**********************************************************************
काळ
एका झाडाच्या ढोलीत काही धनगरांनी आपली भाजी भाकरी ठेवली होती. एका भुकेल्या कोल्ह्याने ती पाहीली आणि आत शिरुन त्याने ती खाऊन टाकली. पण पोट मोठे झाल्याने त्याला ढोलीतून बाहेर पडता येईना.त्याचे रडणे-ओरडणे ऐकून जवळून जाणारा दुसरा कोल्हा जवळ आला.व विचारू लागला.सर्व हकीकत कळल्यावरतो म्हणाला “अस्स, मग आता आत जातांना जितका बारीक होतास तितका होईपर्यंत आतच रहा.मग तुला सह्ज बाहेर पडता येईल.”
तात्पर्य :-
काही कठीण समस्या केवळ काळानेच सुटू शकतात.
*********************************************************************
प्रयत्नांची मर्यादा
एका शिकारी कुत्र्याने एका सशाचा पाठलाग सुरू केला. पण अखेर ससा पळून जाण्यात यशस्वी झाला. हे पाहून कुत्र्याच्या मालकाने त्याला विचारले, ‘एका सशाने तुला हरवावे ?’ यावर कुत्रा म्हणाला, “ धनी माझे धावणे हे पोटासाठी शिकार मिळविण्यासाठी होते, तर त्या सशाचे धावणे हे स्वःताचा जीव वाचवण्यासाठी होते.तेंव्हा त्याची गती माझ्या गतीपेक्षा अधिक असणे साहजिकच नाही का ? ”
तात्पर्य :-
जीवावर बेतते तेव्हा स्वःताला वाचविण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांना मर्यादा नसते.
उपकार
                                एका गावात एक श्रीमंत माणूस राहात होता. तो कधीच दानधर्म करीत नसे पण लोक त्याला ‘देशभक्त’ मानत असत. एकदा तो देवाचे दर्शनासाठी गेला. स्वच्छ हातपाय धुवून दर्शन घ्यावे म्हणून तो नदीवर गेला. हात पाय धुता धुता पाय घसरुन पाण्यात पडला व गटांगळ्या खाऊ लागला. त्याला बाहेर काढण्यास कोणाचाच धीर होईना. तेवढ्यात एका साधूचे त्याचेकडे लक्ष गेले. साधूने त्याला सुखरुप पाण्याबाहेर काढले. साधूला देण्यासाठी त्याने खिशातून खूप पैसे बाहेर काढले पण दिली एक पावली. हे बघून काठांवरच्या लोकांना खूप राग आला.एकाने तर त्याला उचलून पाण्याजवळ नेले व पाण्यात फेकून देऊ लागला हे पाहून साधू म्हणाला “त्याला पुन्हा पाण्यात ढकलू नका, लोकांनो त्याने स्वःताच्या किंमतीप्रमाणे बक्षीस देण्यासाठी पावली बाहेर काढली.आता गावात त्याला एवढीच किंमत मिळेल. हे ऐकूताच श्रीमंत माणूस खजील झाला.
तात्पर्य:-
उपकार कर्त्याचे उपकार स्मरणे हे आपले परम कर्तव्य आहे.
*******************************************************************
धनाचा विनियोग
               एकदा एक कोल्हा जमिनीत बीळ खणत असताना खूपच खोल खणत गेला. खूप खोल गेल्यावर त्याला तिथे एक धनाचा हंडा दिसला व त्यावर एक वृद्ध नाग त्या धनाचे रक्षण करत होता. कोल्ह्याने नागाला विचारले,”हे नागदेवता, तुम्ही इथे काय करता आहात.” नाग म्हणाला,” माझ्या पूर्वजांनी पुरून ठेवलेल्या धनाचे मी रक्षण करत आहे.” मग कोल्हा पुन्हा म्हणाला, ” पण इथं इतकं मोठं धन असताना तुम्ही कधी त्याचा उपभोग घेतला आहे किंवा नाही.  उपभोग सोडा थोडं फार धन दानापोटी तरी खर्च केलंत काय?” नाग म्हणाला,” कसं शक्य आहे ? हे धन कमी होऊ नये म्हणून तर मी स्वत: या धनाचे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहे. त्याचा उपभोग घेणे किंवा दुसयाला दान देणे ह्या पेक्षा या धनाचे रक्षण करण्यातच मला जास्त आनंद आहे.” हे ऐकून कोल्हा नागाला म्हणाला,” मग नागदेवा, तुमच्या असल्या या श्रीमंतीपेक्षा मी गरीब आहे तोच बरा.ज्या धनाचा उपभोग घेतला जात नाही व ज्यातून दान केले जात नाही अशा धनाचा काय उपयोग”
तात्पर्य –
ज्या धनाचा योग्य विनियोग न होता केवळ संचय केला जातो त्या धनाचा मनुष्य मात्राला काहीच फायदा नाही.
सिंह आणि लांडगा
एक सिंह आणि लांडगा असे दोघे वनातून फिरत असताना त्यांच्या कानी काही मेंढ़यांचा आवाज आला. तो आवाज ऐकून मोठ्या बढाईने लांडगा सिंहाला म्हणाला,”महाराज, तुम्ही आता चालून चालून दमला असाल, तेव्हा तुम्ही इथेच बसा. मी तुमच्यासाठी दोन-चार मेंढ्या मारून आणतो. याप्रमाणे बोलून लांडगा मेंढ्यांच्या आवाजाच्या रोखाने गेला असता त्याला त्या मेंढ्यांच्या कळपाजवळ मेंढ्यांचा धष्टपुष्ट मालक आणि चार शिकारी कुत्रे असल्याचे दिसले. त्याबरोबर तो लांडगा परत पावली सिंहाकडे आला व म्हणाला, ” महाराज तुम्ही तर या जंगलाचे राजे आहात आणि तिकडे उभ्या असलेल्या मेंढ्या रोगट आणि अशक्त आहेत.इतक्या सा-या मेंढयामध्ये एकही मेंढी चांगली नाही तेव्हा आपण दुसरी कोणती तरी शिकार करणेच बरे होईल.” सिंहानेही शिकारी कुत्र्यांचा आवाज ऐकला होता त्यामुळे सिंहाला लांडग्याचा धूर्तपणा लक्षात आला.
तात्पर्य – आपली असहाय्यता लपविण्यासाठी काहीना काही सबबी पुढे करणे हा प्राणीमात्रांचा स्वभाव आहे,
  ******************************************************************

मुर्खांचे निष्कर्ष
एका खगोल शास्त्रज्ञाने दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण केले. त्याला निरीक्षणातून असे कळून आले की सूर्यावर प्रचंड मोठा प्राणी आहे व आपण खूप मोठा शोध लावला.या समजूतीने तो लोकांना जमवून त्या शोधाची माहिती सांगू लागला की ”सूर्य प्रचंड उष्ण तारा असूनही त्यावर एक प्राणी जीवंत राहतो आणि तुम्ही सगळे आता घाबरून राहा जर तो प्राणी पृथ्वीवर आला तर पृथ्वीचे काय होईल हे पहा.” खगोल शास्त्रज्ञाच्या या बोलण्यावर काही लोकांचा खरेच विश्वास बसला व त्यांच्यापैकी काही लोकांनी त्याचा सत्कार करण्याचे ठरविले.पण जमलेल्या काही लोकांपैकी एकजण चिकित्सक होता त्याने त्या ज्योतिष्याची दुर्बिण तपासायचे ठरविले व ती तपासली असता त्याच्या लक्षात आले की महाकाय प्राणी हा सूर्यावर नसून एकमाशी दुर्बिणीच्या काचेवर अडकून पडली आहे आणि सूर्याकडे पाहताना ती माशी म्हणजे महाकाय प्राणी असल्याचा भास होत होता. चिकित्सक माणसानेही गोष्ट लोकांना सांगताच त्यांना शास्त्रज्ञाचा मूर्खपणा लक्षात आला. 
तात्पर्य :-  मूर्खपणामुळे कधी ना कधी तोंडावर आपटावे लागते.
ज्योतिषी
अवंती नगरीचे राजा बाहुबली यांना राज ज्योतिष्याची गरज होती. मंत्रि परिषदेसमोर त्यांनी ही इच्छा व्यक्त केली.  राज ज्योतिषाबाबत घोषणा केली जावी आणि पात्र व्यक्तिला निरखुन पारखून नियुक्त केले जावे अशी सर्व मंत्रिगणांनी सर्व सहमतीने ठरवले. या पदासाठी पात्र उमेदवारांनी मुलाखती द्याव्यात अशी दवंडी दुस-या दिवशी राज्यात पिटवण्यात आली. सर्व उमेदवार ठरलेल्या वेळी दरबारात उपस्थित झाले. राजाने स्वत:च मुलाखती घेण्यास सुरुवात केली. अनेक ज्योतिष्यांनी आपल्या ज्ञानाचे सादरीकरण करण्यास सुरुवात केली परंतु राजाचे समाधान झाले नाही. अखेरीस तीन ज्योतिषी उरले त्यातील पहिल्या ज्योतिष्याला राजाने विचारले,”तुम्ही भविष्य कसे सांगता” ज्योतिषी म्हणाला,”नक्षत्रपाहून” राजाने दुस-या ज्योतिष्याला हाच प्रश्न विचारला तेव्हा दुसरा ज्योतिषी म्हणाला,”हस्तरेषा पाहून भविष्य सांगतो” राजाला कुणाचीच उत्तरे आवडली नाहीत. अचानक राजाला तेव्हा आपल्या राज्यातील निर्धन ज्योतिषी विष्णु शर्माची आठवण झाली. विष्णु शर्माला तात्काळ बोलावण्यात आले. राजाने विष्णु शर्माला विचारले,”तुम्ही ज्योतिषी असूनसुद्धा या मुलाखतीसाठी का आला नाहीत. तुम्हाला राज ज्योतिषी होणे आवडत नाही काय” विष्णु शर्माने सांगितले,”महाराज मी घरी बसून माझ्या स्वत:च्या पत्रिकेचा अभ्यास केला व माझ्या अभ्यासानुसार या पदावर मीच नियुक्त होणार आहे. तुम्ही मला निमंत्रण पाठवून मला बोलावून घ्याल हे मला माझ्या अभ्यासातून आधीच कळाले होते. त्यामुळे मी या पदासाठी मुलाखत देण्यास आलो नाही.  राजाला विष्णु शर्माची अभ्यासूवृत्ती व त्याचा आत्मविश्वास या दोन्हीचा अभिमान वाटून त्याने विष्णु शर्माला राज ज्योतिषी म्हणून नियुक्त केले.
तात्पर्य – ज्यांचा स्वत:वर विश्वास असतो ते कधीच हार मानत नाहीत व त्यांच्याकडे संधी आपोआप चालून येते.
*******************************************************************
लाडूची चोरी
पूर्वीच्या काळची गोष्ट आहे, दोन तरूण एका मिठाईच्या दुकानात गेले, दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे आहे पाहून त्यातल्या एका मुलाने जवळच असलेल्या एका थाळीतील एक लाडू उचलला आणि दुस-या मुलाच्या हाती दिला, त्याने तो लाडू पटकन खिशात टाकला, थाळीतील एक लाडू कमी झाल्याचे लक्षात येताच तो हलवाई त्या तरूणांना म्हणाला, ”तुम्ही दोघेच जण इथे आहात तेव्हा तुम्हां दोघांपैकीच कोणीतरी एकाने तो लाडू चोरला आहे, ”यावर प्रत्यक्षात लाडू चोरणारा तरूण म्हणाला, ”देवाशप्पथ, मी खरं सांगतो की लाडू माझ्याकडे नाही.” ज्याच्या खिशात तो लाडू होता, तो तरूण म्हणाला,” देवाशप्पथ खरंच सांगतो मी लाडू मुळीच चोरलेला नाही.” दुकानदाराला खरे काय ते माहित असूनही केवळ यांच्या भाषिक कसरतीमुळे त्यांची चोरी सिद्ध करू शकला नाही.
तात्पर्य – भाषेच्या कसरतीमुळे एखादा इसम निरपराधी असल्याचे सिद्ध करता आले नाही तरी प्रत्यक्षात तो अपराधी असतो.
  *****************************************************************
सेवा हाच धर्म
एका पत्रकारांनी स्वामी विवेकानंदांची कीर्ती ऐकलेली होती. त्यांच्याकडून चार ज्ञानाच्या गोष्टी शिकाव्यात अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्या पत्रकारांचे दोन मित्र त्यांना भेटावयास आले व बोलता-बोलता स्वामी विवेकानंदांचा उल्लेख निघाला. तिघांनी विवेकानंदांना भेटायला जाण्याचे ठरविले.तिघेही मिळून स्वामीजींकडे गेले. विवेकानंदांनी तिघांचीही आस्थेने विचारपूस केली.या दरम्यान स्वामीजींना असे कळाले की तिघे ही पंजाब प्रांतातील आहेत. त्या काळात पंजाबात दुष्काळ पडलेला होता.त्यांनी त्यासंदर्भात चर्चा केली.दुष्काळग्रस्तांसाठी चाललेल्या मदतकार्याची माहिती घेतली.त्यानंतर शैक्षणिक, नैतिक आणि सामाजिक बाबींवर चर्चा केली. निघताना पत्रकार महाशय विवेकानंदांना म्हणाले,”स्वामीजी, आम्ही तुमच्याकडे धार्मिक उपदेश मिळेल या उद्देशाने आले होतो.पण तुम्ही मात्र सामान्य अशा बाबींवरच चर्चा केलीत. आम्हाला यातून ज्ञानवर्धक असे काहीच मिळाले नाही.” स्वामी विवेकानंदांनी मोठे मार्मिक उत्तर दिले,” मित्रवर्य,जो पर्यत या देशात एक जरी मूल उपाशी राहिले तर धर्माची चर्चा करण्यापेक्षा त्याची भूक कशी भागवता येईल हे पाहणे जास्त महत्वाचे आहे. ज्याचे पोट भरलेले नाही त्याला धर्मोपदेश देण्यापेक्षा भाकरी देणे महत्वाचे. रिकाम्या पोटी तत्वज्ञानाचा उपदेश उपयोगी नाही.”
  *****************************************************************
देण्याचे महत्व
एका वृद्ध गृहस्थाला तीन मुले होती.त्याचा अंत:काळ जवळ आला तेव्हा त्याने तिघा मुलांना आपल्याजवळ बोलावले व म्हणाला, ” जेव्हा मी मरेन तेव्हा मी सांगतो त्याप्रमाणे माझी सर्व संपत्ती वाटून घ्या. मोठ्या मुलाने अर्धी मालमत्ता घ्यावी.मधल्या मुलाने तिसरा हिस्सा  घ्यावा व तिस-याने नववा वाटा घ्यावा.” हे सांगितल्यावर मुलांनी त्या गोष्टीला होकार दिला.काही दिवसांनी वृद्धाचे निधन झाले.क्रियाकर्म पूर्ण झाल्यावर मुलांनी मालमत्तेचा हिशोब केला तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की आपल्याकडे 17 उंट आहेत पण वडिलांनी सांगितल्याप्रमाणे 17 उंटांची वाटणी नीट प्रमाणात होत नाही हे कळताच तिघेही भांडू लागले. त्यावेळेस त्यांच्या वडिलांचे एक वर्गमित्र म्हणाले,”मुलांनो तुम्ही मला माझ्या मुलांसारखेच आहात. एका उंटाचाच फक्त प्रश्न आहे तर तो मी सोडवतो, माझ्याकडील एक उंट तुम्हाला घ्या व तुमचा प्रश्न सोडवा. आता उंटांची संख्या 18 झाली. मग पुन्हा वाटणी केली तेव्हा मोठ्या मुलाला अर्धा वाटा म्हणजे (9उंट)मिळाले, मधल्या मुलाला तिसरा वाटा (6उंट) आणि धाकट्याला तिसरा वाटा (2उंट) मिळाले. मुले समाधानी होऊन आपापला वाटा घेऊन गेली.वडिलांचे मित्र तिथेच थांबून राहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की वाटणीसाठी दिलेला उंट वाटणी होऊन सुद्धा तसाच शिल्लक होता.त्यांनी ईश्वराचे आभार मानले.
तात्पर्य :- सृष्टीचा नियम आहे की ”जितके द्याल तितकेच भरभरून तुम्हालाही मिळेल.”
  *****************************************************************
मुर्ख डोमकावळा
एका गरूडाने कुरणात चरत असलेल्या मेंढ्यांच्या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्या कोकराला पळवून नेले. त्याचे हे धाडस आणि सामर्थ्य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्या गरूडाकडे भीतीयुक्त आदराने पाहू लागले.’गरूडाने पळवलेत्या पेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरूडापेक्षाही आपला मानसन्मान वाढेल, त्याच्या इतकीच प्रतिष्ठा आपल्याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले.त्यासाठी त्याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्या पाठीवर बसून त्याला उचलण्याचा प्रयत्न केला पण ते कोकरू उचलले जाण्या ऐवजी, डोमकावळ्याचेच पाय कोकराच्या पाठीवरील लोकरीमध्ये अडकले व तिथून सुटण्यासाठी त्याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्या कानी गेली. तो तिथे आला व त्याने डोमकावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्याला स्वत:च्या मुलांच्या स्वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले,”बाबा या पक्ष्याचे नाव काय हो” यावर तो मेंढपाळ हसून म्हणाला,” या मूर्ख पक्ष्याला जर तुम्ही याचे नाव विचारले तर हा स्वत:ला गरूडापेक्षा ही श्रेष्ठ असा पक्षी म्हणून स्वत:ची ओळख करून देईल पण प्रत्यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार डोमकावळा आहे.”
तात्पर्य – काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्याची प्रचंड सवय असते. यामध्ये त्यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी इतर सूज्ञलोक हे त्यांची पात्रता जाणून असतात.
  *****************************************************************
विजय असो
एकदा एका गावात दोन कोंबड्यांची झुंज सुरु झाली.भांडणाचे कारण ही भारीच होते, एका कोंबडीशी कुणी लग्न करायचे यावरून त्या दोघांत खूप भांडणे झाली व त्याचे पर्यवसान झुंजीत झाले.अटीतटीच्या झुंजीत दोघेही एकमेकांवर प्रहार करू लागले.मारामारीत दोघांचेही अंग रक्तबंबाळ झाले, त्यातील एकाने मग रक्तबंबाळ झाल्याने सरळ पळून जाऊन आपल्या खुराड्याचा आधार घेतला व तिथूनच तो आणि ती कोंबडी बाहेर काय चालले आहे हे पाहू लागले.भांडणात खुराड्याच्या बाहेर असलेल्या कोंबड्याला हा आपला विजय वाटून त्याने घराचे छत गाठले व तिथून जोरजोराने त्या कोंबडीकडे बघून ”मी जिंकलो, मी जिंकलो” असे ओरडू लागला, स्वत:चाच जयघोष करू लागला. तेवढ्यात वरून एक गरूड आला व त्याने त्या ओरडणाया कोंबड्याला उचलले व लांब जाऊन त्याने त्याला मारून खाऊन टाकले. हे पाहिल्यावर पराभूत झालेला कोंबडा व कोंबडी बाहेर आले तेव्हा तो कोंबडा कोंबडीला म्हणाला,”मी जर बाहेर राहिलो असतो तर त्या कोंबड्यासारखीच माझी हालत झाली असती. मी माझ्या जीवाला जसा जपतो तसाच तुलाही जपेन.”
तात्पर्य – ज्याच्या डोक्यात यशाची हवा चढते तेव्हाच त्याच्या पराजयाची सुरुवात होते. यश पचविता येणे ही एक मोठी गोष्ट आहे.
  ******************************************************************
परोपकार
एका गावात एक निर्धन मनुष्य राहत होता. परिस्थिती गरीबीची असूनही तो मनाने उदार होता. आपल्या घासातील घास देण्यासही तो कमी पडत नसे. एकदा एका शेठजीकडे तो जेवावयास गेला असताना त्या शेठजीने त्याला पंचपक्वान्नाचे ताट वाढून दिले. ती भरगच्च पदार्थांनी भरलेली थाळी बघून त्या गरीबाला वाटले की यातून किमान तीन माणसांची भूक भागू शकेल. त्याने शेठजीची परवानगी मागितली व त्यातील अन्न त्याने बरोबर घेतले व घराकडे जाण्यास निघाला. रस्त्यात त्याला एक भिकारी भेटला त्याला त्याने खायला दिले. त्यातून उरलेले अन्न घेऊन तो घरी आला, तो जेवायला बसणार इतक्यात एक भिक्षुक या माणसाच्या घरी आला व त्याने त्याला अन्नदान करण्याची विनंती केली. गरीबाने त्याच्या समोरील ताट त्या भिक्षुकाच्या स्वाधीन केले. त्यानंतर अजून एक अपंग व्यक्ती दाराशी आली त्यानेही या गरीबाकडे अन्न मागितले त्याला ही आपल्या थाळीतील अन्न खायला दिले.आता याच्याकडे देण्यासारखे काहीच शिल्लक राहिले नाही तेव्हा याने स्वत:ची भूक भागविण्यासाठी एक भांडेभर पाणी घेतले तर समोरून एक वृद्ध व्यक्ती आली व तिने ते पाणी पिण्यासाठी मागितले. याला आता खाण्यापिण्या सारखे काहीच उरले नाही तरीही ही व्यक्ती समाधानात होती आजचा दिवस आपल्यामुळे किमान चार लोकांना तरी खाण्यापिण्यास मिळाले.तो ह्याच विचारात असताना तेथे देव प्रगटले व म्हणाले,’मी तुझी परीक्षा घेण्यासाठीच भिकारी, भिक्षुक, अपंग आणि वृद्ध व्यक्तिचे रूप घेतले होते व तुझ्याकडून काहीना काही मिळते का नाही हे पाहिले आणि तु स्वत:चा विचार न करता दुस-याचा जीव जाणून घेतलास व देत राहिलास. आता या पुढे तुला काहीच कमी पडणार नाही असा मी तुला वर देतो.” इतके बोलून देव अंतर्धान पावले.
तात्पर्य – देण्यातच खरे सुख लपलेले आहे. कुणाचाही घास हिरावून घेण्यापेक्षा कुणाला तरी एखादा घास देता कसा येईल याचा विचार करणे यातच खरे सुख लपलेलेआहे.
  ******************************************************************
सत्तेचा सुविनियोग
   एक  राजा  होता. त्याचे  सुखी  व  संपन्न  राज्य  होते. दुर्दैवाने  एकदा  त्याच्या  राज्यात  पाऊसच  पडला  नाही.  त्यामुळे  दुष्काळाचे  संकट  उभे  ठाकले. गरिबांचे  हाल  होऊ लागले. बादशहाने  आपला  खजिना  जनतेसाठी  खुला  केला. एके दिवशी  तो  खजिनाही  संपला. आता  पुढे  काय  हा प्रश्न  राजासमोर  उभा  ठाकला. प्रजाजनांचे  पोषण  कसे  करता  येईल  ही एकच  चिंता  राजाला  सतत  सतावित  होती. त्याने  त्याच्या  बोटातली  हि-याची अंगठी नोकरांना दिली  व  सांगितले, ”ही  अंगठी  घेऊन  शेजारच्या  देशात जा, तेथील  राजाला  आपली  सर्व परिस्थिती  सांगा. तो  राजा  आपली अवस्था  जाणेल  व हा हिरा फार दुर्मिळ आहे. या  हि-याच्या बदल्यात त्याच्याकडून धान्य मागून आणा व जनतेत वाटप करा. ” मंत्र्यांनी राजाला विचारले,”राजन, इतका महागडा, दुर्मिळ हिरा तुम्ही का विकत आहात, दुसरी काहीतरी सोय करता येईल.” राजा म्हणाला,”माझे राज्य ही माझी संपत्ती आहे. प्रजा उपाशी मरत असताना मी महागडा हिरा का सांभाळत बसू. प्रजा आहे तर मी आहे. असे हिरे पुन्हा प्राप्त करता येतील पण प्रजा एकदा जर नाराज झाली तर पुन्हा अशी प्रजा मला मिळणार नाही.”
तात्पर्य :-
आपल्या हाती जर सत्ताअसेल तर त्याचा योग्य विनियोग कसा करता येईल हे पहाणे इष्ट ठरते.
   **********************************************************************
सत्तेचा सुविनियोग
एका नगरात एक पुजारीबाबा राहत होते. शेजारच्या गावातील पुजाऱ्याचे अकस्मात निधन झाल्याने या पुजारीबाबाना त्या गावात पुजारी म्हणून नियुक्त केले गेले. एकदा त्या गावी जाण्यासाठी पुजारी बाबा बसमध्ये चढले, त्यांनी कंडक्टरला पैसे दिले आणि ते आपल्या जागेवर जाऊन बसले. कंडक्टरने तिकिटाचे पैसे घेतले व उरलेली रक्कम पुजारीबाबाना परत केली तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले कि त्यात १० रुपये जास्त आले आहेत. पुजारीबाबानी असा विचार केला कि आता कंडक्टर घाईत आहे तेंव्हा त्यांना थोड्या वेळाने पैसे परत करू या. काही वेळ झाला कंडक्टर अजूनही त्याचे तिकिटे देण्याचे काम करतच होता. पुजारीबाबांच्या मनात एक विचार आला कि आता तर कंडक्टर इतका घाईत आहे कि त्याला ते १० रुपये परत केले काय आणि नाही केले काय काय फरक पडणार आहे. सरकारी बस कंपनी इतके पैसे मिळवते प्रवाशांकडून मग इतक्या छोट्या रकमेने त्यांना काय होणार? लाखो रुपयांचे व्यवहार करणाऱ्या कंपनीकडून हे १० रुपये आपल्या सारख्या पुजाऱ्याला भेट मिळाले असेच आपण समजू. आपण याचा काही तरी सदुपयोग करू शकू. पुजारीबाबांच्या मनात असे विचार चालू असतानाच त्यांचे उतरायचे ठिकाण आले. बसमधून उतरताना अचानक त्यांचा हात खिशाकडे गेला व त्यातून ती दहा रुपयाची नोट त्यांनी बाहेर काढली व कंडक्टरला परत दिली व म्हणाले,”भाऊ !! तुम्ही मघाशी मला तिकिटाचे पैसे परत करताना घाईगडबडीत हे दहा रुपये जास्त दिले आहेत.” कंडक्टर हसून म्हणाला,”महाराज! तुम्हीच या गावाचे नवे पुजारी आहात का?” पुजारीबाबा हो म्हणाले. त्यावर कंडक्टर पुन्हा बोलू लागला,” महाराज, माझ्या मनात तुमचे प्रवचन ऐकण्याची खूप इच्छा होती. तुम्हाला बसमध्ये चढताना पाहिले आणि मनात एक विचार आला कि चला आपल्याला या कामामधून वेळ मिळत नाही आणि तुमची भेट घडून येत नाही तेव्हा तुम्ही जसे प्रवचनात उपदेश करता ते आचरणात आणता काय याचा पडताळा घ्यावा म्हणून मी ते दहा रूपये तुम्हाला मुद्दाम जास्त दिले होते. पण मला आता कळून चुकले आहे की तुम्ही जसे बोलता तसेच तुमचे पवित्र आचरण आहे. महाराज मला क्षमा करा.” एवढे बोलून कंडक्टरने गाडी पुढे जाण्यासाठी बेल वाजवली. पुजारीबाबांना आता घाम फुटला होता, ते घाम पुसत आकाशाकडे पहात म्हणाले,” प्रभो, तुझी लीला अपरंपार आहे, दहा रूपयांचा मोह मला आत्ता किती महागात पडू शकला असता पण तुम्ही मला त्यातून वाचवले. देवा तू खरंच दयाळू आहेस. अचानक का होईना त्या दहा रूपयांच्या मोहातून तू मला बाहेर काढले व समाजात होणारी माझी बदनामी थांबवली. तात्पर्य – मोह हा वाईट असतो, ज्याक्षणी मोहाने मन ग्रासते त्याक्षणीच मानव प्रगतीकडून अधोगतीकडे प्रवास करू लागते.

 

यावर आपले मत नोंदवा